भारतीय संघ व्यवस्थापन सध्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाचा शोध घेत असला तरी अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाल्यास मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा उदयोन्मुख फलंदाज श्रेयस अय्यरने व्यक्त केली.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रेयसचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून चौथ्या स्थानासाठी त्याला लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. मात्र २४ वर्षीय श्रेयसने आपण कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्याची तयारी दर्शवली आहे, असे सांगितले.

‘‘चौथ्या स्थानावर कोण फलंदाजी करेल, याविषयी मला काहीही कल्पना नाही. हा संपूर्णपणे संघ व्यवस्थापनाचा निर्णय असून मी त्यांच्याकडे जाऊन मला चौथ्या क्रमांकावरच खेळवा, असे सांगू शकत नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन ठरवेल त्या क्रमांकावर खेळण्यासाठी मी सज्ज आहे,’’ असे श्रेयस म्हणाला.

‘‘या मालिकेत अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देत संघ व्यवस्थापन चौथ्या क्रमांकाचा तिढा कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र मी फक्त अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळवण्याच्या प्रतीक्षेत असून गरज पडल्यास चौथ्या अथवा त्याखालच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्यासाठी मी स्वत:ची मानसिक तयारी केली आहे,’’ असेही सहा एकदिवसीय सामन्यांत दोन अर्धशतके झळकावणाऱ्या श्रेयसने सांगितले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या लढतीसाठी श्रेयसचा अंतिम ११ जणांमध्ये समावेश करण्यात आला होता, पण हा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे उर्वरित सामन्यात त्याला चौथ्या स्थानावर संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

श्रेयसला अधिकाधिक संधी देण्याची आवश्यकता -गंभीर

श्रेयस अय्यर हा नक्कीच एक गुणी फलंदाज असून त्याला या मालिकेत चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केली. ‘‘श्रेयससोबत मी दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंगरूममध्ये वेळ घालवला आहे. त्याची विचारसरणी अगदी स्पष्ट असून भारताला मधल्या फळीत आवश्यक अशा फलंदाजाचे सगळे गुण त्याच्याकडे आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला अधिकाधिक संधी द्यावी, हीच अपेक्षा आहे,’’ असे गंभीर म्हणाला.