श्रेयस अय्यर आणि खलिल अहमद यांच्या आश्वासक खेळीच्या जोरावर भारत अ संघाने पहिल्या अनौपचारिक वन-डे सामन्यात विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अकीम जॉर्डन आणि रोस्टन चेसच्या भेदक माऱ्यासमोर भारत अ संघाचा डाव १९० धावांत आटोपला. मात्र खलिल अहमद आणि इतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने सामन्यात ६५ धावांनी विजय मिळवला.

ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल हे भारताचे सलामीवीर फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. कर्णधार मनिष पांडेही अवघ्या ४ धावा काढून माघारी परतला. मात्र यानंतर श्रेयस अय्यरने मधल्या फळीतल्या फलंदाजांना हाताशी धरुन अर्धशतकी खेळी केली. श्रेयस अय्यरने ७७ धावा केल्या, त्याच्या खेळीमुळे भारताने १९० धावांपर्यंत मजल मारली. विंडीज अ संघाकडून रोस्टन चेसने ४ तर अकीम जॉर्डनने ३ बळी घेतले. शेफर्ड आणि कॉर्नवॉल यांनी १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.

प्रत्युत्तरादाखल विंडीज अ संघाची सुरुवातही खराब झाली. विंडीजचा निम्मा संघ ९५ धावांवर माघारी परतला. खलिल अहमदने विंडीजच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडलं. मधल्या फळीत कार्टर आणि पॉवेल यांनी प्रत्येकी ४१-४१ धावांची खेळी करत विंडीजच्या डावाला आकार दिला. मात्र भारतीय गोलंदाजांनी विंडीजच्या फलंदाजांचे प्रयत्न हाणून पाडले. भारताकडून खलिल अहमदने ३ तर राहुल चहर, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. दिपक चहरने एका फलंदाजाला माघारी धाडलं.