आपल्या खराब फॉर्ममुळे गेल्या काही दिवसांत चर्चेमध्ये असलेल्या लोकेश राहुलने अखेरीस आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघातलं आपलं स्थान गमावलं आहे. राहुलला संघातून डच्चू दिल्यानंतर रोहित शर्माला कसोटी संघात सलामीच्या जागेवर संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात लोकेश राहुलला वन-डे संघात आपलं चौथ्या क्रमांकाचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल असं मत, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे.

“वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन ही भारताची जमलेली सलामीची जोडी आहे. त्यातच सध्या मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर हे फलंदाज सर्वोत्तम कामगिरी करत राहुलला चांगलीच टक्कर देत आहेत. या स्पर्धेमुळे लोकेश राहुलला आता आपलं वन-डे संघातलं चौथ्या क्रमांकाचं स्थान टिकवून ठेवावं लागणार आहे. मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर हे दोन्ही फलंदाज त्याला चांगलीच टक्कर देतील.” टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या आपल्या कॉलममध्ये गांगुलीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

आतापर्यंत २३ वन-डे आणि २८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलेल्या लोकेश राहुलला आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र रोहित-शिखरच्या उपस्थितीत राहुलला राखीव खेळाडूंच्या रांगेत बसावं लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात लोकेश राहुल आपल्या खेळात सुधारणा करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.