2019 चा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असतानाही भारतीय संघाच्या फलंदाजीच्या चिंता काही केल्या संपलेल्या नाहीयेत. सलामीवीरांच्या खेळातील सातत्याचा अभाव, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणी यायचं हा मोठा प्रश्न अजुनही भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहे. मध्यंतरी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या संघाचं कौतुक करत, कोणताही फलंदाज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो असं म्हटलं होतं. यावेळी शास्त्रींनी विराट कोहलीलाही विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं जाऊ शकतं असे संकेत दिले होते. मात्र भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला रवी शास्त्रींचा हा विचार पटलेला दिसत नाहीये.

India TV वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने शास्त्री यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. “विराट पुनरागमन केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. मध्यंतरी मी वृत्तपत्रांमधून वाचलं की रवी शास्त्री विराटला चौथ्या क्रमांकावर पाठवणार आहे असं वाचलं होतं. पण विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तर तिसऱ्या क्रमांकावर कोण येईल?? कदाचीत अंबाती रायुडू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो…पण हा पर्याय योग्य वाटत नाही. यामुळे संघाचं संतुलन बिघडू शकतं.”

रोहित शर्मा – शिखर धवन जोडी सलामीला आणि तिसऱ्या जागेवर विराट कोहली ही भारतीय फलंदाजीची ताकद असल्याचंही सौरव गांगुलीने यावेळी स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ आता घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – ऋषभ पंत विश्वचषकासाठी संघात हवाच – मोहम्मद अझरुद्दीन