अनुभवी फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर सध्या समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आता भारताचा माजी कर्णधार व महान फलंदाज सौरव गांगुलीचीही भर पडली आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवायचे असल्यास त्याला कामगिरी उंचावण्याची गरज आहे अन्यथा त्याच्यावर संघाबाहेर जाण्याची वेळ ओढवू शकते, अशी कणखर प्रतिक्रिया गांगुलीने दिली. ‘‘धोनी हा एक अनुभवी फलंदाज तसेच चाणाक्ष व्यक्ती असून भारताला विश्वचषकात त्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठी धोनीने स्वत: चांगली कामगिरी केली पाहिजे. एकदिवसीय सामन्यात २५ षटके शिल्लक असताना फलंदाजीला आल्यास त्याला सध्या संघाचा डोलारा सावरणे कठिण जात आहे,’’ असे गांगुली म्हणाला. तो पुढे म्हणाला, ‘‘धोनीविषयी सर्वानाच आदर आहे. एकदिवसीय सामन्यांत त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. मात्र, भारताकडे गुणी खेळाडूंची खाण उपलब्ध आहे. त्यामुळे निवड समितीने संघाच्या हिताचे जे आहे त्याला अनुसरून निर्णय घेतला पाहिजे.’’