काठमांडू (नेपाळ) येथे सुरू असलेल्या २१व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने निर्विवाद वर्चस्वाची मालिका कायम राखताना पदकांच्या त्रिशतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. सोमवारी भारताने २७ सुवर्ण, १२ रौप्य आणि ३ कांस्यपदकांसह एकूण ४२ पदकांची कमाी केली. त्यामुळे भारताच्या खात्यावर १५९ सुवर्ण, ९१ रौप्य, ४४ कांस्य पदकांसह एकूण २९४ पदके जमा आहेत. मंगळवारी अंतिम दिवशीसुद्धा भारत अग्रस्थानी राहणार, हे पक्के झाले असून भारताने सलग १३व्यांदा अग्रस्थान पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. कबड्डी : भारताला दुहेरी सुवर्णयश काठमांडू : काठमांडू येथील एपीएफ सभागृहात झालेल्या कबड्डी स्पर्धेत भारताने अपेक्षेप्रमाणेच दुहेरी सुवर्णयश मिळवले. पुरुष गटात भारताने श्रीलंकेला, तर महिलांमध्ये नेपाळला नमवले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत २८-११ अशी मध्यंतरापर्यंत आघाडी घेतली होती. पवन कुमार शेरावत, नवीन कुमार यांनी आक्रमक चढाया करत भारताला आघाडी मिळून दिली, तर पकडीत नितेश कुमार, परवेश, विशाल भारद्वाज यांनी चांगला खेळ केला. मग भारताने ५१-१८ असा श्रीलंकेचा धुव्वा उडवला. महिलांच्या अंतिम सामन्यात पहिल्या सत्रात १४-१० अशी आघाडी भारताकडे होती. परंतु उत्तरार्धात भारतीय संघाने आक्रमक खेळ करत ५०-१३ असा एकतर्फी विजय मिळवला. भारताकडून चढाईत सोनाली शिंगटे, पुष्पा, साक्षी कुमारी यांनी दिमाखदार खेळ केला, तर दीपिका जोसेफ, प्रियांका, रितू नेगी यांनी उत्कृष्ट पकडी केल्या.