श्रीलंकेचा शैलीदार फलंदाज महेला जयवर्धने एकदिवसीय विश्वचषकाच्या तीन अंतिम सामन्यांत खेळला आहे. मात्र जेतेपद हाती घेण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. विश्वविजयासह क्रिकेटला अलविदा करण्याची इच्छा आहे, असे जयवर्धनेने सांगितले. २०११ एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जयवर्धनेचे सुरेख शतक भारताच्या विजयामुळे वाया गेले होते. त्याआधीच्या २००७ विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. याशिवाय २००९ मध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात अंतिम सामन्यात तो संघाचा भाग होता. मात्र या संघावर पाकिस्तानने मात करत जेतेपद पटकावले होते. हा ट्वेन्टी-२० विश्वचषक श्रीलंकेतच आहे. घरच्या मैदानावर चषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न साकार होऊ शकते, असे जयवर्धने म्हणतो. आम्हाला आमची कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक सामना, फेरी अशा पद्धतीने आम्ही योजना आखणार आहोत, असे जयवर्धनेने स्पष्ट केले.
दिलशान मुनाविरा आणि अकिला धनंजया हे युवा होतकरू खेळाडू आहेत. त्यांनी गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणूनच त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे, असे जयवर्धनेने सांगितले. ट्वेन्टी-२० प्रकारातही गेल्या पाच वर्षांत बरेच बदल झाले आहेत, नवनवे डावपेच लढवावे लागत आहेत.