आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सट्टेबाजी व स्पॉट-फिक्सिंग आदी प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य ते उपाय करावेत, अशी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विनंती केली आहे.
आयपीएल स्पर्धेचा कोणताही आर्थिक भार शासनावर पडणार नाही. त्यामुळे खेळाचाच एक प्रकार म्हणून या स्पर्धेला मान्यता देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र या स्पर्धेस परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व गृहमंत्रालय यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयला पत्राद्वारे कळवले आहे.
या पत्राद्वारे त्यांनी मंडळाकडून क्रिकेटमधील भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, याची माहितीही मागितली आहे. आंतरराष्ट्रीय सामने ज्या ठिकाणी नियमितरीत्या होतात, त्याऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये हे सामने घेण्याची कारणेही क्रीडामंत्रालयाने बीसीसीआयला विचारली आहेत. अमिरातीमध्ये आयपीएलमधील पहिल्या टप्प्यातील सामने आयोजित केले जाणार आहेत.