करोना विषाणूमुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती आणि ३ मे पर्यंत वाढवलेलं लॉकडाउन पाहता…बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. जोपर्यंत स्पर्धा सुरु करण्यासाठी योग्य वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत स्पर्धा खेळवली जाणार नाही असं स्पष्टीकरण आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक काढून दिलं आहे. दरम्यान श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आयपीएलचा तेरावा हंगाम श्रीलंकेत भरवण्याची ऑफर बीसीसीआयला दिली आहे. राऊटर्सने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

“श्रीलंका भारताआधी या परिस्थितीतून बाहेर पडेल असं दिसत आहे. असं झाल्यास आयपीएल आम्ही श्रीलंकेत भरवू शकतो. यावर बीसीसीआयचं काय म्हणणं आहे याची आम्ही वाट पाहू.” श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मीसिल्वा यांनी राऊटर्सशी बोलताना माहिती दिली. मध्यंतरी भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर काळात स्पर्धेचं आयोजन करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र बीसीसीआयने यावर कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

“या देशातील प्रत्येक नागरिक आणि आयपीएलशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींचं आरोग्य चांगलं रहावं ही सध्या महत्वाची गोष्ट आहे. बीसीसीआय, आयपीएल संघमालक, प्रक्षेपण करणारी वाहिनी व इतर समभागधारक यांच्याशी चर्चा केल्यानंतर, स्पर्धेसाठी योग्य वातावरण तयार झालं तरच आयपीएल खेळवण्याबद्दल विचार केला जाईल”. अशी भूमिका गव्हर्निंग काऊन्सिलने मांडली आहे. बीसीसीआय सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, भविष्यात स्पर्धा सुरु करण्याबाबत विचार झाल्यास केंद्र, राज्य सरकार आणि सर्व संबंधित यंत्रणांशी सल्लामसलत केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयच्या परिपत्रकात म्हटलं आहे.