भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला उद्यापासून कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर सुरुवात होणार आहे. मात्र या कसोटीवर सध्या पावसाचं सावट असल्याचं दिसतंय. आज सकाळी कोलकात्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे टीम इंडियाने सकाळच्या सत्रात सराव केला नाही. हवामान विभागाने दिेलेल्या माहितीनुसार कोलकात्यात शनिवारपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोलकाता कसोटीत पहिले ३ दिवस किती खेळ होईल यावर शंका निर्माण केली जात आहे.

अवश्य वाचा – मलाही विश्रांतीची गरज आहे – विराट कोहली

श्रीलंका दौऱ्यात निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर विजयी फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र भारतीय संघाकडून झालेल्या पराभवानंतर श्रीलंकेनेही दणक्यात पुनरागमन करत पाकिस्तानचा कसोटी मालिकेत २-० असा पराभव केला, त्यामुळे श्रीलंकेला कमी लेखणं भारतीय संघाला झेपणारं नाहीये. सध्या विराट कोहलीचा भारतीय संघ हा चांगल्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला घरच्या मैदानावर हरवल्यानंतर भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे.

अवश्य वाचा – जडेजाला अव्वल स्थान मिळवण्याची संधी

दुसरीकडे दिनेश चंडीमलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या श्रीलंकेचा संघ भारताच्या तुलनेत अनुभवी नाहीये. अँजलो मॅथ्यूज आणि रंगना हेरथचा अपवाद वगळता एकाही खेळाडूकडे भारतीय खेळाडूंना टक्कर देता येईल इतका अनुभव नाहीये. भारतीय मैदानात गेल्या ३५ वर्षांत श्रीलंकेच्या संघाने १६ कसोटी सामने खेळले आहेत, मात्र या एकाही सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे या मालिकेत श्रीलंका आपल्या पराभवाचा वचपा काढतं, की भारत आपला विजयी फॉर्म कायम राखत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांना धोनीने दिले उत्तर