विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे सामना रद्द झाला आहे. श्रीलंका-बांगलादेश सामना रद्द झाला असून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला आहे. या सामन्यात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. इंग्लंडमध्ये होत असलेली ही पाचवी विश्वचषक स्पर्धा आहे.

बऱ्यापैकी कामगिरी करूनदेखील सलग दोन पराभव स्वीकाराव्या लागलेल्या बांगलादेशच्या संघाला सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव असलेल्या श्रीलंकेविरुद्ध विजयाची आशा दिसत होती. पण पावसाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले.श्रीलंकेचा पाकिस्तान विरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. पावसामुळे श्रीलंकेला दोन गुण मिळाले आहेत.

बांगलादेशने त्यांच्या विश्वचषक अभियानाचा प्रारंभ अत्यंत दिमाखात करीत दक्षिण आफ्रिकेला २१ धावांनी पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडकडून दोन गडी राखून पराभव झाल्याने तर इंग्लंडकडून १०६ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांची गाडी अडखळली.