जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाच्या शर्यतीत रंग भरायला सुरुवात झाली असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये श्रीनिवासन-पवार भेटीने सर्वानाच आश्चर्यचकित केले आहे. आपल्याला अध्यक्षपदाच्या निवडणूकीत जिंकण्यासाठी लागणारी मते मिळतील, याबाबत त्यांना शाश्वती नसल्यामुळे त्यांनी पवांरांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
याबाबत श्रीनिवासन यांनी सांगितले की, ‘‘ तुम्ही जे तर्क वितर्क लढवत आहात, तेच माझ्या मनात आहेत.’’
श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकल्यावर याविरोधात पवार यांनी पहिल्यांदा आवाज उठवला होता. त्यामुळे पवार आणि श्रीनिवासन यांच्यामध्ये सलोखा निर्माण होण्याची चिन्हे नसल्याचे म्हटले जात असले तरी राजकारणात काहीही होण्याची शक्यता असते.
श्रीनिवासन आणि पवार हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जातात, पण राजकारणात कुणी कुणाचाच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असे म्हटले जाते. त्यामुळे जर या दोन दिग्गज धुरीणांमध्ये मनोमीलन झाल्यास बीसीसीआयची निवडणूक होणार नसल्याची शक्यता आहे आणि निवडणूक झाल्यास या दोघांनी पाठिंबा दिलेला व्यक्ती जिंकून येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी श्रीनिवासन आणि पवार यांच्यामध्ये बुधवारी रात्री दोन तास सखोल चर्चा झाली असे म्हटले जात आहे. पवार विदर्भाचा दुष्काळी दौरा करत आहेत. त्यामुळे पवारांना भेटण्यासाठी श्रीनिवासन खास विमानाने नागपूरला दाखल झाले होते. त्यापूर्वी श्रीनिवासन यांनी बीसीसीआयमधील आपल्या विश्वासू व्यक्तींची भेट घेऊन साऱ्या गोष्टींचा अंदाज घेतला होता. श्रीनिवासन यांच्या बरोबरच्या बैठकीमध्ये बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये नेमके काय करायचे, यावर ६-७ संघटकांनी चर्चा केल्याचे समजते.
पूर्व विभाग बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आणि श्रीनिवासन यांचे विश्वासू अमिताभ चौधरी यांचा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे. पण दुसरीकडे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर हे राजीव शुक्ला यांच्यासाठी मागच्या दरवाज्याने पूर्व विभागात ‘फिल्डिंग’ लावत असल्याचे म्हटले जात आहे.

श्रीनिवासन यांची पवार भेट का?
आपल्याकडे १० मते असल्याचे श्रीनिवासन यांना वाटत होते, पण सध्याच्या घडीला आपल्याकडे सहा मते असल्याचे त्यांना वाटत आहे. कारण पूर्व विभागातील सहा आणि दक्षिण विभागातील चार संघटना आपल्या बाजूने असल्याचे त्यांना वाटत होते. पण त्यांच्या घरी झालेल्या बैठकीला पूर्व विभागाचे एकच संघटक उपस्थित होते. दक्षिण विभागाची चारही मते त्यांना मिळतील, पण पूर्व विभागातील सहाच्या सहा मते आपल्याला मिळतील याबाबत श्रीनिवासन यांना साशंकता आहे. कारण पूर्व विभागात अमिताभ चौधरी यांच्यापेक्षा अनुराग ठाकूर यांच्या शब्दाला वजन असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे पूर्व विभागाने जरी चौधरी यांचा प्रस्ताव ठेवला तरी ते सारेच त्यांना मतदान करतील, अशी शाश्वती त्यांना देता येत नाही. त्यामुळे पवार यांच्याशी निगडित असलेल्या संघटनांचा आपल्याला पाठिंबा मिळाल्यास निवडणूक सोपी जाईल, असे श्रीनिवासन यांना वाटत आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांनी पवार यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.

पूर्व विभागाने फिरवली पाठ
आपल्याकडे पूर्व विभागाची सहा पैकी सहा मते असल्याचा भ्रम श्रीनिवासन यांना होता आणि त्यामुळेच ते अमिताभ चौधरी यांना जिंकून आणू असे वाटत होते. पण त्यांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये पूर्व विभागातील ओदिशाचा फक्त एकच संघटक उपस्थित होता. रणजिब बिस्वाल काही कामांमुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे दक्षिणेतील चार आणि पूर्व विभागातील दोन अशी सहा मते श्रीनिवासन यांच्याकडे आहेत.

अनुराग ठाकूर यांची बाजी
पूर्व विभागाच्या संघटकांचे मन वळवण्यात सध्याच्या घडीला बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यशस्वी झाल्याचे दिसत आहेत. कारण एन. श्रीनिवासन यांनी आपल्याला पूर्व विभागीतल सर्व म्हणजे सहा मते मिळतील, अशी खात्री होती. पण त्यांच्याबाजूने सध्याच्या घडीला फक्त दोनच मते असून चार मते फोडण्यात ठाकूर यशस्वी ठरल्याचे म्हटले जात आहे.

चलाख श्रीनिवासन
आपण आयसीसीचे कार्याध्यक्षपद भूषवत असताना बीसीसीआयमध्ये आपल्या विश्वासातील व्यक्ती असावी, असे श्रीनिवासन यांना वाटते. त्यांना स्वत:ला न्यायालयाच्या आदेशामुळे ही निवडणूक लढवता येऊ शकणार नाही आणि त्यामुळे त्यांनी अमिताभ चौधरी यांना पुढे केले आहे. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात जेव्हा त्यांना अध्यक्षपदाचा त्याग करावा लागला होता तेव्हा त्यांनी चलाखीने दालमिया यांना अध्यक्षपदावर बसवले होते. त्यानंतर त्यांना निवडून आणण्यामध्येही श्रीनिवासन यांनी भूमिका वठवली होती. आता श्रीनिवासन हे पवार यांना गळ घालण्यासाठी गेले असून यामागे नेमके काय राजकारण आहे, हे गुलदस्त्यात आहे. पण पवार श्रीनिवासन यांच्या गळाला लागतात का? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.