पुरुष गटातील कोल्हापूरविरुद्धच्या सामन्याच्या वेळी सरपंच सूर्यकांत राऊळ यांना मारहाण केल्याबद्दल अहमदनगर संघाच्या अजहर सय्यद शेखवर एक वर्ष बंदीची कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर व अहमदनगर यांच्यात सकाळच्या सत्रात झालेला पुरुष गटाचा सामना १८-१८ असा बरोबरीत सुटला. या सामन्यात शेवटचे मिनिट बाकी असताना सरपंच सूर्यकांत राऊळ यांनी दिलेल्या एका निर्णयावरून दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची सुरू झाली. नगर संघाच्या अजहर सय्यद शेखने राऊळ यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे आणखीनच गोंधळ निर्माण झाला. साहजिकच पोलिसांना पाचारण करावे लागले, तरीही बराच वेळ गोंधळ सुरूच होता. पंचांनी सामना बरोबरीत संपल्याचे जाहीर केले. बेशिस्त खेळाडूवर त्वरित शिस्तभंगाची कारवाई केली नाही, तर स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची धमकी पंचांनी दिली. अखेर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या खेळाडूवर एक वर्ष कोणत्याही स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली आहे.