नवतरुण क्रीडा व सामाजिक विकास मंडळ कारावी यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत मुंबईचा विजय स्पोर्ट्स, ठाण्याचा उजाला, कल्याणचा ओम आणि कोल्हापूरचा शाहू सडवली या संघांनी विजयी सलामी दिली. रायगडच्या श्रीविठ्ठल, गणेश या संघांना पराभवाला सामोरे जावे लागले. रायगडच्या नवजीवन व मुंबईच्या बंडय़ा मारुती या दोन संघांतील सामना बरोबरीत सुटला.
ठाण्याच्या उजाला संघाने रायगडच्या श्री विठ्ठल संघावर १४-६ अशी मात केली. उजालाचे शैलेश पाटील, बाळकृष्ण पाटील व स्वप्नील पाटील चमकले. श्रीविठ्ठलचे सचिन पाटील व शशांक पाटील छान खेळले. शाहू सडवली संघाने रायगडच्या गणेश संघावर १८-८ असा विजय मिळवला. शाहू संघाचे कुलदीप पाटील व महेश मुगदम यांनी चागला खेळ केला. गणेशचा राजेंद्र तांडेल एकाकी लढला.
मुंबईच्या विजय संघाने रायगडच्या छत्रपती संघाचा ३०-२१ असा पराभव केला. कल्याणच्या ओम संघाने रायगडच्या ज्ञानेश्वर संघाचा १४-८ असा पराभव केला. ओम संघाच्या शशांक हळदणकर व सुशील भोसले यांच्या चढायांना प्रशांत चव्हाण याच्या पकडीची साथ मिळाली. ज्ञानेश्वरचे राहुल कोळी व परेश कोळी चमकले. रायगडचा नवजीवन व मुंबईचा बंडय़ा मारुती यांच्यातील शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेला हा सामना ११-११ असा बरोबरीत सुटला.