रोहन गमरे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू मुंबई : चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचीच पुनरावृत्ती प्रभादेवीत झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत झाली. रत्नागिरीने मुंबईचा ३७-३२ असा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. वेगवान चढायांबरोबर पकडींचाही अप्रतिम खेळ करणारा रत्नागिरीचा रोहन गमरे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. मुंबईचा अजिंक्य कापरे सर्वोत्तम चढाईपटू आणि रत्नागिरीचा शुभम शिंदे सर्वोत्तम पकडपटू ठरला. चवन्नी गल्ली मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या अजिंक्य पवारने मुंबईच्या कापरेची पकड करून २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र मुंबईच्या जाधव, कापरेने एकापेक्षा एक चढाया करीत रत्नागिरीचे संरक्षण खिळखिळे केले. मुंबईचा गुणांचा वेग इतका भन्नाट होता की ९-९ अशा बरोबरीतला सामना दोन मिनिटांत १५-९ असा केला. पण मुंबईला ही आघाडी पुढची पाच मिनिटेही कायम राखता आली नाही. पण रोहन आणि अजिंक्य पवार यांनी रत्नागिरीला बरोबरीत आणले. या वेगवान चढायांमुळे आघाडीवर असलेली मुंबई मध्यंतराला १७-१९ अशी पिछाडीवर पडली. शेवटची सात मिनिटे शिल्लक असेपर्यंत सामना दोलायमान स्थितीत होता. रत्नागिरीकडे २९-२६ अशी माफक आघाडी होती. परंतु बदली खेळाडू ओंकार कुंभारची चढाई सामन्याला कलाटणी देणारी ठरली. मग रत्नागिरीने कापरेची पकड करून मुंबईवर लोण लादत ३३-२६ अशी निर्णायक आघाडी घेतली आणि सामन्यावरही पकड मजबूत केली.