ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-२० सामना जिंकून भारतीय संघ क्रिकेटविश्वात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या आघाडीच्या तीन संघांमध्ये स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मागे टाकत भारताने या यादीत तिसरं स्थान पटकावलं आहे. वन-डे, कसोटी आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत सर्वाधिक विजय मिळवत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ९८० तर इंग्लंडने ७४५ सामने जिंकले आहेत. रांचीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय हा भारताचा आंतराष्ट्रीय क्रिकेटमधला ६६६ वा विजय ठरला. पाकिस्तान ६६५ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.

पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात कर भारताने ५० टी-२० सामने जिंकणाऱ्या देशांच्या यादीतही आगेकूच केली आहे. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेनंतर ५० टी-२० सामने जिंकणारा भारत चौथा देश ठरला आहे. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी या यादीत मात्र भारतापेक्षा पुढे आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ६९ टी-२० सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ५७ तर श्रीलंकेने ५१ टी-२० सामने जिंकले आहेत.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या देशांची यादी –

१. ऑस्ट्रेलिया – १८०३ सामने – ९८० विजय

२. इंग्लंड – १७८३ सामने – ७४५ विजय

३. भारत – १५२६ सामने – ६६६ विजय

४. पाकिस्तान – १४०८ सामने – ६६५ विजय

५. वेस्ट इंडिज – १३८४ सामने – ५९२ विजय

६. दक्षिण आफ्रिका – १०९५ सामने – ५७० विजय

७. श्रीलंका – ११६३ सामने – ५०६ विजय

८. न्यूझीलंड – १२४७ सामने – ४६१ विजय

९. झिम्बाब्वे – ६४७ सामने – १५३ विजय

१०. बांगलादेश – ५०३ सामने – १३६ विजय