कर्णधार सुनील छेत्री याने इंज्युरी वेळेत केलेल्या अप्रतिम गोलमुळेच भारतास दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या साखळी सामन्यात १-१ अशी बरोबरी स्वीकारता आली. गतविजेत्या भारताने साखळी गटातील पहिल्या लढतीत पाकिस्तानवर १-० अशी मात केली होती. या लढतीच्या तुलनेत बांगलादेशच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना झुंजविले. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ केला नाही. ८२ व्या मिनिटाला अतिउर रहेमान मेशु याने बांगलादेशला १-० अशी आघाडी मिळवून दिली. याच आघाडीच्या जोरावर ते हा सामना जिंकणार असे वाटत असतानाच छेत्रीने इंज्युरी वेळेत गोल केला आणि संघास पराभवाच्या नामुष्कीतून सोडविले.