मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद सनरायजर्सदरम्यान झालेल्या सामन्यात हैदराबादने हातातून निसटणारा विजय मिळवत मुंबईचा एक विकेट राखत पराभव केला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात टॉस हारल्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट्स गमावत १४७ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना एकवेळ अशी आली होती की हैदराबाद संघ अत्यंत सहजपणे हा सामना जिंकेल असं वाटलं होतं. मात्र ऐनवेळी बुमराहने युसुफ पठाण आणि राशीद खानची लागोपाठ विकेट घेत सामन्याचं चित्र पालटलं. यानंतरच्या ओव्हरमध्ये मुस्तफिजूरने दोन विकेट घेत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. पण अखेरच्या ओव्हरमध्ये ११ धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर हुडाने षटाकर ठोकत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना अखेर हैदराबादने जिंकला आणि हातातून निसटलेला विजय अक्षरक्ष: खेचून आणला.

मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली असता कर्णधार रोहित शर्मा फक्त ११ धावांवर आऊट झाला. सिद्धार्थ कौलने सहाव्या ओव्हरमध्ये इशान किशन (९) आणि इव्हिन लुईस (२९) यांची विकेट घेत मुंबईसमोर अडचण निर्माण केली. कृणाल पांड्यादेखील (१५) संघाचा डाव सावरुन शकला नाही. सुर्यकुमार यादव आणि किरन पोलार्ड यांनी संघाला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दोघांनीही २८-२८ धावांची खेळी केली. हैदराबादसमोर मुंबईने १४७ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

हैदराबाद संघ १४७ धावांचं माफक आव्हान अत्यंत सहजपणे पार करेल अशी परिस्थिती झाली होती. रिद्धिमान साहा आणि शिखर धवनने पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची खेळी केली, ज्यामुळे संघाला चांगली सुरुवात मिळाली. साहाने २२ धावा केल्या, तर शिखर धवनने २८ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. मात्र यानंतर केन विल्यिमसन (६), मनीष पांडे (११) आणि शाकिब अल हसन (१२) महत्वपूर्ण खेळी करु शकले नाहीत. १२४ धावांवर हैदराबादने पाच विकेट्स गमावल्या होत्या. युसूफ पठाण आणि दीपक हुडा अत्यंत सहजपणे संघाला सामना जिंकून देईल असं वाटत होतं. पण मुंबईने पुनरागमन करत हैदराबादची चिंता वाढवली होती. पण अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना अखेर हैदराबादने जिंकला.