सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भारताचा निलंबीत क्रिकेटपटू श्रीशांत याची आजन्म बंदीविरोधातली याचिका दाखल करुन घेतली आहे. २०१३ साली गाजलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात श्रीशांतसह आणखी दोन खेळाडूंना अटक करण्यात आली होती. यानंतर केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या याचिकेवर निर्णय देत श्रीशांतवरील आजन्म बंदी कायम राखली होती. न्यायालयाच्या या निर्णयाला श्रीशांतने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. ८ आठवड्यांनंतर श्रीशांतच्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचं समजतं आहे.

गेल्या ५ वर्षांपासून आपण कोणत्याही प्रकारे क्रिकेट सामने खेळत नसून आपल्यावर लादण्यात आलेली आजन्म बंदीची शिक्षा कठोर असल्याचं श्रीशांतने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मात्र बीसीसीआयने या प्रकरणी आपली भूमिका अजुनही कायम ठेवली आहे. श्रीशांत आणि बुकी यांच्यातील संभाषणाच्या टेपमध्ये त्याने पैसे स्विकारल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे श्रीशांतवर लावण्यात आलेली आजन्म बंदी योग्य असल्याचं बीसीसीआयमधील सुत्रांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये श्रीशांतच्या याचिकेवर काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.