क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या कुटुंबीयांवर पंजाबच्या पठाणकोट येथे काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात रैनाचे काका अशोक आणि भाऊ कौशल याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी राज्यात सक्रिय असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील तीन जणांना अटक केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती देत प्रकरण निकाली निघाल्याचं जाहीर केलं. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात रैनाच्या ५८ वर्षीय काका अशोक यांची हत्या झाली होती. या हल्ल्यात त्यांची आई सताया देवी, पत्नी आशा देवी, मुलगा कौशल व आपिन हे जखमी झाले होते. त्यानंतर कौशलचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला होता.

पोलीस आणि मुख्यमंत्री यांनी माहिती दिल्यानंतर सुरेश रैनाने आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या. “आज सकाळी मी पंजाबमध्ये माझ्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ले प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असल्याचे समजले. पंजाब पोलिसांने केलेल्या कारवाईसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तिघांना केलेल्या अटेकमुळे आमचे कुटुंबीय परत येणार नाहीत हे खरं असलं तरी भविष्यात असे गुन्हे घडण्यास नक्कीच प्रतिबंध बसेल. पंजाब पोलीस आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार”, असे ट्विट त्याने व्यक्त केले.

दरम्यान, विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करून या टोळीतील तिघांना अटक केली. तर ११ जण अजूनही फरार आहेत. त्यानादेखील लवकरच जेरबंद करण्यासाठी पंजाब पोलीस कार्यरत आहे अशी माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिनकर गुप्ता यांनी दिली. टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी पंजाब रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टींमध्ये छापेमारी केली. तेथेच हे तिघे लपून बसले होते. या छापेमारीत दोन लाकड्याच्या काठ्या, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे दीड हजार रूपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

पठाणकोटमधील थारियाल गावात १९ आणि २० ऑगस्ट दरम्यान घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात ‘काळे कच्छेवाला’ टोळीतील तीन ते चार जण घर लुटण्याच्या हेतूने आले होते. पठाणकोटच्या माधोपूरजवळील थारियाल गावात ते अशोक कुमार यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर रैनाने स्वत: ट्विट करून मुख्यमंत्री आणि पंजाब पोलीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.