सुरत : ऋतुराज गायकवाडने (४२) दिलेल्या एकतर्फी झुंजीनंतरही महाराष्ट्राला गुरुवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या अव्वल साखळी सामन्यात दिल्लीकडून ७७ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार ध्रुव शोरे (नाबाद ४८) आणि हिम्मत सिंग (३२) यांच्या उपयुक्त योगदानामुळे दिल्लीने २० षटकांत ५ बाद १६७ धावा केल्या. शिखर धवनला (२४) मोठी खेळी करणे जमले नाही.

प्रत्युत्तरात नितीश राणाच्या (४/१७) फिरकीपुढे महाराष्ट्राचा संपूर्ण संघ ९० धावांतच गारद झाला. ऋतुराजवगळता महाराष्ट्राच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. केदार जाधव (८), राहुल त्रिपाठी (७) यांनी निराशा केली. रविवारी महाराष्ट्राचा बडोद्याशी सामना रंगणार आहे.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली : २० षटकांत ५ बाद १६७ (ध्रुव शोरे नाबाद ४८, हिम्मत सिंग ३२; शम्सुझमा काझी २/२०) विजयी वि. महाराष्ट्र : १७.२ षटकांत सर्व बाद ९० (ऋतुराज गायकवाड ४२; नितीश  राणा ४/१७, वरुण सुद १/१५).