करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २०२० वर्ष हे सर्वांसाठी खूप कठीण गेलं. तब्बल ३-४ महिन्यांचा कालावधी आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद ठेवले होते. कालांतराने या सामन्यांना सुरुवात झाली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी २०२० वर्ष हे कायम लक्षात राहणार आहे. कारण यंदाच्या वर्षात विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही.

२०२० वर्षात विराट कोहली वन-डे, टी-२० आणि कसोटी क्रिकेट मिळून ३० डाव खेळला. परंतू एकाही डावांत त्याला शतक झळकावता आलेलं नाही.

अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव ३६ धावांत आटोपला. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी भेदक मारा करत टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा विराट दुसऱ्या डावात ४ धावा काढून बाद झाला.