भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरला सुरु होणार आहे. यासाठी भारतीय संघ अॅडलेडमध्ये दाखल झाला आहे. याआधी 3 टी-20 सामन्यांची मालिका भारताने 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती. याचसोबत 4 दिवसांचा सराव सामनाही भारताने अनिर्णित राखला. अॅडलेड येथे दाखल होतानाचे फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. अॅडलेमध्ये दाखल झाल्यानंतर स्थानिक भारतीय चाहत्यांनी भारतीय संघासोबत सेल्फी घेत त्यांचं स्वागत केलं.

अॅडलेड कसोटीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना पर्थ येथे 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येईल. तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे मेलबर्न व सिडनी येथे 26 डिसेंबर आणि 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. हे सामने अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे जानेवारी महिन्यात होतील. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे. सराव सामन्यात भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला दुखापत झाली असून तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही.