ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ४ कसोटी सामन्यात दिवस-रात्र कसोटी सामन्याचा समावेश करण्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला जरी दिवस रात्र कसोटी सामना खेळवण्यात रस असला, तरीही भारतीय क्रिकेट संघ हा अद्याप गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या दिवस-रात्र कसोटीसाठी सज्ज झालेला नाही, असे सांगत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिवस-रात्र कसोटीसाठी प्रशासकीय समितीला नकार कळवला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना ॲडिलेड येथे ६ ते १० डिसेंबरदरम्यान खेळण्यात येणार आहे. हा सामना दिवस-रात्र पद्धतीचा असावा, असा प्रस्ताव क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठेवला होता. या संदर्भात प्रशासकीय समितीने १२ एप्रिलला रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केली. ‘मी या बाबतीत भारतीय संघाशी चर्चा केली. भारतीय संघ हा गुलाबी चेंडूने क्रिकेट खेळण्यास अद्याप पूर्णपणे तयार झालेला नाही. अशा परिस्थितीत दिवस-रात्र पद्धतीचा कसोटी सामना खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे रवी शास्त्री यांनी प्रशासकीय समितीला सांगितल्याचे समिताच्या सदस्याने सांगितले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघातील कर्णधार स्टिव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फलंदाज कॅमरुन बॅनक्रॉफ्ट यांच्यावर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बॉल टॅम्परिंगचे आरोप झाल्यामुळे स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षाची तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत भारताला ऑस्ट्रेलियात पहिलीवहिली कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. अशा परिस्थितीत गुलाबी चेंडूने क्रिकेट खेळण्यास पूर्णत: तयार नसलेल्या भारतीय संघाला नमवल्यास ऑस्ट्रेलियाला मालिकेसाठी गती मिळेल आणि ते भारतीय संघाला नको आहे, अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगली आहे.