करोना विषाणूच्या तडाख्यामुळे गेले दोन-अडीच महिने ठप्प झालेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. भारतीय संघदेखील ३ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधी दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेअंतर्गत या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. या कसोटी मालिकेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ उत्सुक आहेत. मात्र या दौऱ्याआधीच भारताचा ‘कसोटी स्पेशालिस्ट’ माजी फलंदाज राहुल द्रविड याने भारतीय संघाला एक ‘वॉर्निंग’ दिली आहे.

“स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांशिवाय खेळणं ऑस्ट्रेलियासाठी खूप कठीण होतं. कारण ते त्यांचे महत्त्वाचे दोन फलंदाज होते आणि ऑस्ट्रेलियासाठी या दोघांनी खूप धावा केल्या आहेत. त्यांचं कसोटी संघात पुनरागमन झाल्यानंतर काय घडलं ते आपण साऱ्यांनी पाहिलं. वॉर्नर चांगल्या लयीत नव्हता. पण स्मिथने मार्नस लाबूशेनला साथीला घेत Ashes मालिका गाजवली. गेल्या कसोटी मालिकेतील पराभवाबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा संघ म्हणेल की मागच्या वेळी आमचे दोन सर्वोत्तम फलंदाज स्मिथ आणि वॉर्नर संघात नव्हते. पण आता ते दोघेही संघात आहेत, त्यामुळे आता आपण जिंकू शकतो. स्मिथ-वॉर्नर जोडी खूप घातक आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघापुझढे त्या दोघांचं मोठं आव्हान असेल”, अशी चेतावणी सोनी टेन वाहिनीच्या फेसबुक लाइव्हदरम्यान द्रविडने टीम इंडियाच्या शिलेदारांना दिली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसरी कसोटी ही दिवस-रात्र पद्धतीची आहे. ११ ते १५ डिसेंबर दरम्यान अ‍ॅडलेड-ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे. या दिवस-रात्र कसोटीत भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचा संघ सरस ठरेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने व्यक्त केला आहे. “भारतापेक्षा आम्ही गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी अधिक खेळलो आहोत. त्याचा आमच्या संघाला उपयोग होईल. भारतीय संघाने कोलकातामध्ये दिवस-रात्र कसोटीत दमदार कामगिरी करून दाखवली. गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामना थोडं अवघड असतं, पण भारतीय संघाकडे असे फलंदाज आणि गोलंदाज आहेत, ज्यांना कठीण प्रसंगात संघाला कसं वर आणायचं हे नीट माहिती आहे. टीम इंडियातील खेळाडू हे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. ते कोणत्याही गोष्टी पटकन आत्मसात करू शकतात, म्हणूनच भारत-ऑस्ट्रेलिया दिवस-रात्र सामना खूप रोमांचक होणार, अशी खात्री स्मिथने दिली.