भारतीय संघाचा ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात ३ टी २०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळण्यात येणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व विराटकडे असल्यामुळे तो वेस्ट इंडिजमध्ये आहे. मात्र विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर कोहलीला विश्रांती आणि थोडा मोकळा वेळ मिळाला. त्या काळात त्याने पत्नी अनुष्का शर्मासोबत वेळ घालवला. अनुष्का आणि विराट ही जोडी कायमच चर्चेत असते. त्यातच आता अनुष्काच्या एका मुलाखतीमुळे ही जोडी पुन्हा चर्चेत अली आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपला पती विराट कोहली याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की विराट अतिशय शांत आहे. मैदानाबाहेर तो अतिशय संयमी असतो. तुम्ही माझ्या मित्रमंडळींना आणि माझ्या सहकाऱ्यांना विचारा. ते देखील तुम्हाला हेच सांगतील. खऱ्या आयुष्यात तो आक्रमक नसतो, पण मैदानावर मात्र आक्रमक असतो, त्याचे कारण त्याला क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. त्याच्यासाठी हे एका स्वप्नासारखे आहे. मी देखील जेव्हा त्याच्याकडे पाहते, तेव्हा त्याचा संयम आणि शांतपणा पाहून मी पण आश्चर्यचकित होते.

“एकमेकांना विमानतळावर सोडायला जाणे किंवा आणायला जाणे या गोष्टी आमच्यासाठी खूप खास असतात. हे क्षण खूपच महत्वाचे असतात. पण त्यासाठी तुम्हाला कशाला प्राधान्य द्यायचे ते ठरवायला लागते. मी कधीही त्याला सोडायला जाताना ‘तुझं काम सोडून माझ्यासोबत अजून थोडा वेळ घालव’ असा हट्ट कधीही धरत नाही. विराटदेखील मला सोडायला येताना असाच असतो. जेव्हा तुम्ही एकमेकांच्या कामांचा आदर करता, तेव्हा नात्यातही आदर कायम राहतो”, असेही ती म्हणाली.