विराट कोहलीचा भारतीय संघ २०१९ विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. साखळी फेरीत इंग्लंडविरुद्धचा पराभव वगळता भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात धडाकेबाज खेळी करत विजय मिळवला होता. मात्र उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारताला १८ धावांनी पराभव स्विकारावा लागला, आणि भारताचं विश्वचषक विजेतेपदाचं स्वप्न भंगलं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या पराभवावर एक मोठं विधान केलं आहे.

“मला आतून वाटत होतं की संघाला एकातरी सामन्यात माझ्याकडून सर्वोत्तम खेळीची अपेक्षा होती. उपांत्य सामन्यात मी नाबाद राहीन असा मला विश्वास होता, पण एका अर्थाने तो माझा अहंकार सिद्ध झाला.” एका खासगी कार्यक्रमात २०१९ विश्वचषकातील उपांत्य सामन्यातील पराभवाबद्दल विचारलं असता विराटने आपली बाजू मांडली.

उपांत्य सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला २३९ धावांत रोखलं होतं. मात्र फलंदाजीत भारतीय संघ पुरता कोलमडला. लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली हे आघाडीच्या फळीतले फलंदाज पत्त्याचा बंगाल कोसळावा तसे एका मागोमाग एक माघारी परतले. मधल्या फळीत रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले.