'फ्लाइंग सिख' या टोपणनावाने गौरवले जाणारे मिल्खा सिंग यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया. त्यांचा जन्म १९२९ साली पंजाब प्रांतातील मुझ्झफरगढ या ठिकाणी झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मुझफरगढ हे ठिकाण पाकिस्तानचा भाग म्हणून घोषित करण्यात आलं. 'फ्लाईंग सिख' या टोपण नावाने ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग यांनी १९६० (रोम) व १९६४ (टोकियो) साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. मिल्खा सिंग यांनी कुठल्याही सरावाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटरचं अंतर केवळ ४५.९ सेकंदात पार केलं होतं. त्यांचा विक्रम अद्याप कोणत्याही भारतीयाला मोडता आलेला नाही. पटियाला येथे १९५६ साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ते पहिल्यांदा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. २०० व ४०० मीटर शर्यंतीत त्यांनी विक्रमी वेळ नोंदवली होती. १९५८ साली टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्यांनी आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला. ६ सप्टेंबर १९६० साली ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ४०० मीटर शर्यतीत चौथा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी ०.१ सेकंदानं त्यांचं कास्य पदक हुकलं होतं. त्या स्पर्धेत कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय ते धावले होते. १९५८ साली झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी सुवर्णपदक मिळवलं होतं. जिंकलेली सर्व पदकं, चषक, ब्लेझर व आपले विक्रमी बूट त्यांनी राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले. त्या काळात मिल्खा सिंग हे देशभरातील तरूणांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व होते. अभुतपूर्वक कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.