करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरीत दोन सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना प्रेक्षकांची गर्दी टाळण्याचे निर्देश दिले आहेत. त्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी आधीच तिकिट खरेदी केलेले आहे त्यांचं आठवडाभरात पैसे मिळणार असल्याची महितीही बीबीसीआयकडून देण्यात आली आहे.

१५ आणि १८ मार्च रोजी अनुक्रमे लखनौ आणि कोलकाता येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये हे दोन सामने खेळवण्यात येणार असून, बंगाल क्रिकेट संघटनेने तिकीट विक्री स्थगित केली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितले. ‘‘भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका सुरू झाल्याने सामने पुढे ढकलणे सध्या अशक्य आहे. परंतु उर्वरित दोन्ही लढती रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवून मोठय़ा प्रमाणावर जमणारी गर्दी टाळण्यासाठी ‘बीसीसीआय’ने निर्णय घेतल्याचं’’ ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.