२००८ साली भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सिडनी कसोटी सामन्यादरम्यान झालेलं नाट्य आजही सर्वांना परिचीत आहे. पंच स्टिव्ह बकनर यांचे वादग्रस्त निर्णय आणि सायमंड्स-हरभजनमध्ये मैदानावर रंगलेला वाद यामुळे सिडनी कसोटी सामना मैदानाबाहेरही चांगलाच रंगला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही पंच बकनर यांच्या खराब कामगिरीबद्दल भारतीय खेळाडू आणि बीसीसीआयने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तब्बल १२ वर्षांनी बकनर यांनी एका मुलाखतीत या कसोटी सामन्यादरम्यान आपल्याकडून दोन चुका झाल्याची कबुली दिली. या चुकांमुळे भारताला सामना गमवावा लागल्याचंही बकनर यांनी मान्य केलं. परंतू भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने बकनर यांचा दावा खोडून काढत…त्या सामन्यात बकनर यांच्याकडून एक नव्हे तर सात चुका झाल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – 2008 SCG Test : माझ्या दोन चुकांमुळे भारताने सामना गमावला – स्टिव्ह बकनर

“सिडनी कसोटी सामन्यात पंच बकनर यांची ती एकमेव चूक नव्हती. मला आठवतंय त्यांनी किमान ७ निर्णय असेच चुकीच्या पद्धतीने दिले होते. याचा फटका आम्हाला बसला. अँड्रू सायमंड्स खेळत असताना तो तीनवेळा बाद झाल्याचं मला चांगलं आठवतंय. पण प्रत्येकवेळी त्याला पंचांनी जीवदान दिलं. सायमंड्स त्या सामन्यात सामनावीर ठरला, आम्ही १२२ धावांनी तो सामना हरलो. सायमंड्सविरोधातला एक निर्णय जरी योग्य दिला गेला असता तरीही तो सामना आम्ही जिंकू शकलो असतो.” इरफान पठाण Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

याच सामन्यात सायमंड्स आणि हरभजन सिंह यांच्यातील मंकीगेट प्रकरणामुळे भारतीय खेळाडूंवर कारवाई होणार होती. परंतू बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यावर सोडून परतण्याची धमकी दिल्यानंतर आयसीसीने एक पाऊल मागे घेतलं होतं. कर्णधार अनिल कुंबळेनेही या सामन्यानंतर केवळ एक संघ खिलाडूवृत्तीने खेळत होता असं म्हणत ऑस्ट्रेलियाला टोमणा लगावला होता. २००८ सिडनी कसोटी सामन्यात भारताकडून सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांना बकनर यांच्या चुकीच्या निर्णयाचं बळी ठरावं लागलं होतं. तर अँड्रू सायमंड्स आणि रिकी पाँटींग हे स्पष्ट बाद असतानाही त्यांना नाबाद ठरवण्यात आलं. सामन्यावर चांगली पकड घेतलेली असतानाही भारताला हा सामना गमवावा लागला होता.

आपली चूक कबूल करताना काय म्हणाले होते पंच स्टिव्ह बकनर??

“२००८ साली सिडनी कसोटी सामन्यात माझ्याकडून दोन चुका झाल्या. पहिली चूक म्हणजे भारतीय संघ ज्यावेळी चांगली कामगिरी करत होता त्यावेळी माझ्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज शतक पूर्ण करु शकला. दुसरी चूक ही पाचव्या दिवशी घडली…ज्यामुळे भारताला सामना गमवावा लागला. पण अशा चुका करणारा मी पहिलाच अंपायर नव्हतो. पण तरीही या दोन चुका मला आयुष्यभर सतावत राहणार आहेत. पण या चुका पंचांकडून का होतात हे देखील जाणून घेतलं पाहिजे. मला कोणतीही सबब द्यायची नाही. पण कधीतरी मैदानात हवा इतकी असते की काही गोष्टी ऐकायला येत नाहीत”, बकनर यांनी आपली बाजू मांडली.

कॉमेंट्री करणाऱ्या लोकांना स्टम्प माईकमुळे चेंडू बॅटला लागला हे कळतं…पण मैदानातला प्रेक्षकांचा आवाज आणि हवा या गोष्टींमुळे कधीकधी पंचांना हा आवाज ऐकायला येत नाही. या गोष्टी प्रेक्षकांना कळत नाहीत आणि नंतर पंचांवर टीका होते, असं बकनर म्हणाले.