२१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात महिलांच्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने नियमांमध्ये मोठा बदल करत, नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांवर दिलेली आहे. याआधी आयसीसीने भारत विरुद्ध विंडीज मालिकेत प्रायोगिक तत्वावर या प्रणालीचा वापर केला होता, यानंतर आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेत हे तंत्रज्ञान वापरण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. २१ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.

मैदानाबाहेरील कर्मचाऱ्यांनी सांगितल्याशिवाय मैदानावरील पंचांनी नो-बॉलचा निर्णय देऊ नये अशा सूचनाही आयसीसीने पंचांना दिलेल्या आहेत. विश्वचषकासारख्या स्पर्धेत निर्णय देताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याकरता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती आयसीसीचे जनरल मॅनेजर जेफ अल्ड्राइस यांनी दिली. मध्यंतरी आयपीएल आणि काही कसोटी सामन्यांमध्ये मैदानावरील पंच नो-बॉलचे निर्णय अचूक देण्यात अपयशी ठरले होते. यानंतर आयसीसीने यावर काही तोडगा काढण्याची मागणी केली जात होती.