राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार आणि प्रियांका गोस्वामी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. त्यामुळे संदीप, प्रियांका आणि राहुल कुमार या भारताच्या तीन खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

आता टोक्यो ऑलिम्पिकसाठी चालण्याच्या शर्यतीत पात्र ठरलेल्या खेळाडूंची संख्या पाच झाली आहे. याआधी के . टी. इरफान आणि भावना जट यांनी पात्रता निकष पार केले होते. संदीपने एक तास २० मिनिटे १६ सेकंद अशी वेळ नोंदवत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. प्रियांकाने १ तास २८ मिनिटे ४५ सेकंद अशा कामगिरीसह सुवर्णपदक संपादन केले. राहुल याने पुरुष गटात १ तास २० मिनिटे २६ सेकंद अशा कामगिरीसह ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले आहे. संदीप याने ५० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

नवदीप, अरविंद यांना सुवर्ण

दुबई : पॅराअ‍ॅथलिट नवदीप आणि अरविंद यांनी १२व्या फझ्झा आंतरराष्ट्रीय जागतिक पॅराअ‍ॅथलेटिक्स ग्रां. प्रि. स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत टोक्यो पॅरालिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान पटकावला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत नऊ सुवर्णपदकांसह १७ पदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या भालाफेक एफ-४१ प्रकारात नवदीपने ४३.५८ मीटर कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. अरविंदने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात १४.०५ मीटर इतकी कामगिरी नोंदवली.