ऋषिकेश बामणे, मुंबई माजी टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांची अपेक्षा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय टेबल टेनिस चमूचा प्रचंड अभिमान वाटतो, परंतु अजूनही आपण पायाभूत स्तरावर पाहिजे तितकी मेहनत घेत नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या खेळीमय वातावरणाचा फायदा उचलून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा खेळ पोहचावा, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी टेबल टेनिसपटू व माजी प्रशिक्षक कमलेश मेहता यांनी दिली. गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने टेबल टेनिसमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. त्याविषयी विचारले असता द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मेहता म्हणाले, ‘‘यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस संघाने सर्वात उठावदार कामगिरी केली. त्यांनी तीन सुवर्णपदकांसह एकूण आठ पदके जिंकून आतापर्यंतच्या राष्ट्रकुलमधील सर्वोत्तम प्रदर्शन केले. मनिका बत्रा, जी. साथियन या युवा फळीला अचंता शरथ, मौमा दास, मधुरिका पाटकर यांसारख्या अनुभवी खेळाडूंची मिळालेली साथ यामुळे भारतीय टेबल टेनिसला सोनेरी दिवस आले आहेत. आपली दुसरी फळीदेखील सक्षम होत आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या आव्हानांचा विचार करता ही फार दिलासादायक गोष्ट आहे.’’ ‘‘शासनातर्फे व्यावसायिक खेंळाडूंना आता मुबलक प्रमाणात सुविधा उपलब्ध पुरवल्या जातात. तसेच स्विडनमध्ये सुरू झालेल्या जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठीसुद्धा भारतीय खेळाडूंना तेथील वातावरणाची सवय व्हावी म्हणून आधीच राहण्याची व प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे,’’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, पायाभूत स्तरावर मुख्य भर देण्यात यावा याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘भारतात आजही अनेक गावा-खेडय़ांमध्ये टेबल टेनिस खेळाविषयी मुंलाना माहिती नाही. गेल्या वर्षभरात एकूण २८ राज्यांच्या ११० शहरांमध्ये आतंरशालेय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाल्या आहेत. हे भविष्याच्या दृष्टीने एक चांगले पाउल नक्कीच आहे. तरीही, टेबल टेनिसचे तरुणांना वेड लावण्यासाठी त्याच्या मुळात जाण्याची आवश्यकता आहे. लहानपणापासूनच टेबल टेनिसमध्ये कारकीर्द घडवता येऊ शकते, हे मुलांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. असे झाल्यास भारताची येणारी पिढी चायना, जपान यांसारख्या देशांना कडवे आव्हान देउ शकते.’’ ‘‘टोकियो ऑलिम्पिकपेक्षा यावर्षी होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. या स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यावरच ऑलिम्पिक पात्रता मिळते त्यामुळे, भविष्यात येणाऱ्या आव्हानांसाठी आतापासूनच तयारी करण्याची भारताची मानसिकता आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय टेबल टेनिस चमूने किमान दोन पदके जिंकली तरी ती अभिमानास्पद बाब ठरेल,’’ असे मेहता म्हणाले.