टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूने रौप्यपदक जिंकत इतिहास घडवला. या सोनेरी कामगिरीनंतर मिराबाईचे अनेकांनी अभिनंदन केले. मिराबाई चानू ही मणिपूरची आहे. या ऑलिम्पिकमध्ये मणिपूरची सहा वेळा विश्वविजेती मेरी कोमही सहभागी झाली आहे. अपेक्षेनुसार मेरी कोमने स्पर्धेतील सुरुवात विजयी पंचने केली. हर्नांडिज हिला ४-१ ने पराभूत करत अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. या स्पर्धेत तिची आणि मिराबाईची भेट झाली. मिराबाईला पाहताच मेरी कोमने घट्ट मिठी मारत ट्विटरवरून भावनिक क्षण शेअर केले आहेत. मेरी कोमने आपल्या ट्विटरल अकाऊंटवरून मिराबाईच्या भेटीचे तीन फोटो शेअर केले. ''अभिनंदन मिराबाई चानू. एकमेकांना पाहून भावूक आणि आनंदी झालो. एकाच फ्रेममध्ये अभिमानी मणिपुरी आणि भारताची सैनिक'', असे मेरीने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. Congratulations @mirabai_chanu . Emotional and happy to embrace each other. A proud Manipuri and a fighter for India in one frame. @NBirenSingh pic.twitter.com/5qrfbDervF — M C Mary Kom OLY (@MangteC) July 25, 2021 मणिपूरची ३८ वर्षीय मेरी कोम टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय दलाची ध्वजवाहक होती. मार्च २०२० आशिया/ओसनिया क्वालिफायरच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले होते. मेरी कोमची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहे. यापूर्वी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत मेरीने कांस्य पदक पटकावले होते. हेही वाचा - IPL 2021 : १९ सप्टेंबरपासून रंगणार दुसरा टप्पा, 'हे' दोन दिग्गज संघ असणार आमनेसामने दुसरीकडे, मणिपूरच्याच मिराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मिराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.