टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू मायदेशी परतली आहे. सिंधू दिल्ली विमानतळावर उतरली. तिथे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. विजयामुळे खूप खुश असल्याचे सिंधूने मायदेशी परतल्यावर सांगितले. सिंधूने बॅडमिंटन असोसिएशनसह सर्वांचे आभार मानले. टोक्योमध्ये सिंधूने चीनच्या बिंग जिआओचा पराभव करत कांस्यपदक पटकावले. सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू आहे. यापूर्वी २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पार्क ते-सांग यांचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले. “सामना जिंकल्यानंतर मी पाच ते दहा सेकंदांसाठी सर्व काही विसरले. त्यानंतर मी स्वत: ला धरले आणि उत्सव साजरा करताना ओरडले”, अशी भावना सिंधूने पदक जिंकल्यानंतर व्यक्त केली होती.

 

 

हेही वाचा – सेहवागचं ट्वीट पाहून नेटकरी गोंधळले; म्हणाला, “मला ९११२०८३३१९ या नंबरवर कॉल करा”

कोच पार्क यांनी वाढवला सिंधूचा आत्मविश्वास

उपांत्य फेरीतील पराभवानंतर सिंधू निराश झाली होती, पण प्रशिक्षक पार्क ते सांग यांनी तिला प्रेरणा दिली. अजून सर्व काही संपलेले नाही, असे त्यांनी सिंधूला सांगितले. सिंधूला उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या ताई झू यिंगकडून १८-२१, १२-२१ असे पराभूत व्हावे लागले होते. ती म्हणाली, “उपांत्य फेरीतील पराभवानंतर मी निराश झाले, कारण मला सुवर्णपदकासाठी आव्हान देता आले नाही. त्यानंतर कोच पार्क यांनी मला समजावून सांगितले की, पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित कर.”

अशी रंगली कांस्यपकदकाची लढत

सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले.