बांगलादेशच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 128 वर्ष अबाधित असलेल्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ढाका येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने विंडीजवर 1 डाव आणि 184 धावांनी मात केली. या विजयासह बांगलादेशने कसोटी मालिकाही 2-0 ने आपल्या खिशात घातली.

या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विंडीजचे पहिले 5 फलंदाज त्रिफळाचीत होऊन माघारी परतले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 1890 साली ही घटना पहिल्यांदा घडली होती. यानंतर आजच्या दिवशी बांगलादेशने या विक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या 5 विकेटपैकी फिरकीपटू मेहदी हसनने 3 तर अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने 2 विकेट घेतल्या. मेहदी हसनला सामनावीर तर शाकीब अल हसनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.