मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये होणाऱ्या क्रिकेट मालिका बंद झाल्या आहेत. जोपर्यंत पाकिस्तान अतिरेकी संघटनांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत भारत क्रिकेट खेळणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली. यानंतर तब्बल ११ वर्ष भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांविरोधात मालिका खेळले नाहीयेत. (विश्वचषक, चॅम्पिअन्स ट्रॉफीतील सामन्यांचा अपवाद वगळता) मात्र पाकिस्तानच्या एका चाहत्याने चक्क विराट कोहलीला पाकिस्तानात क्रिकेट खेळण्याची विनंती केली आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका टी-२० सामन्यादरम्यान शाहबाज कासमी या तरुणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विराट कोहलीला ही विनंती केली आहे.

भारतीय चाहत्यांनीही त्याच्या या मागणीवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

दरम्यान श्रीलंकेच्या संघाने नुकताच पाकिस्तानचा दौरा केला. अतिरेकी संघटनांचे हल्ले आणि दहशतवाद या सावटाखाली असलेल्या पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु व्हावं यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भविष्यात भारत-पाकिस्तान देशांमध्ये मालिका खेळवली जाईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.