दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अवघ्या चेंडूत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना जपानचा संघ अवघ्या ४१ धावांत गारद झाला होता. त्यानंतर ४२ धावांचे अतिशय सोपे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार केले.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय अगदी सार्थ ठरवला. भारताच्या रवि बिश्नोई, कार्तिक त्यागी, आकाश सिंग आणि विद्याधर पाटील या चौघांच्या तोफखान्यापुढे जपानचा डाव ४१ धावांत आटोपला. जपानच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. निम्मा संघ तर शून्यावर बाद झाला. शू नोगुची आणि केन्तु डोबेल या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी ७ धावा केल्या. भारताकडून रवि बिश्नोईने ४, कार्तिक त्यागीने ३, आकाश सिंगने २ आणि विद्याधर पाटीलने १ बळी टिपला.

४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने धमाकेदार खेळी केली. त्याने १८ चेंडूत नाबाद २९ धावा कुटल्या. त्या खेळीत यशस्वीने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याला कुमार कुशाग्र याने चांगली साथ दिली. कुमारने ११ चेंडूच नाबाद १३ धावा केल्या. त्यात २ चौकार होते.

जपानविरूद्धच्या सामन्यातील विजयामुळे भारताने या विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.