ऑकलंड : भारतीय युवा संघाने गतविजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झोकात सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय युवा संघ विश्वचषकासह मायदेशी परतेल, अशी आशा भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केली.

गतविजेत्या भारताने पहिल्या दोन सामन्यांत श्रीलंका आणि जपानचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. ‘‘दक्षिण आफ्रिकेत खेळत असलेल्या भारताच्या युवा संघाला माझ्याकडून शुभेच्छा. त्यांनी या स्पर्धेत चांगली सुरुवात केली असून विश्वचषक ते भारतात आणतील, अशी अपेक्षा आहे,’’ असे रोहित म्हणाला.

प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पुढील सामना शुक्रवारी न्यूझीलंडशी होणार आहे. भारताने चार वेळा युवा विश्वचषक उंचावला असून २०१८मध्ये भारताने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली हे यश संपादन केले होते.