सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करावी का, ही चर्चा गेले काही महिने सर्वत्र खमंगपणे केली जाते. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी या चर्चेत भाग घेण्याचे प्रकर्षांने टाळले. सचिन हा भारताचा महान फलंदाज आहे आणि त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्टीकरण श्रीनिवासन यांनी दिले आहे.
सध्या वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे दोन फलंदाज चांगली कामगिरी होत नसल्यामुळे संघाबाहेर आहेत. परंतु सचिनला या दोघांपेक्षा विशेष वागणूक दिली जाते का, या प्रश्नाला उत्तर देताना श्रीनिवासन म्हणाले की, ‘‘सचिन हा भारतातील सर्वात महान क्रिकेटपटू आहे. त्यामुळे प्रत्येक मालिकेनंतर बसून सचिनच्या कामगिरीचा आढावा घेणे, हुशारीचे ठरणार नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सचिन इतरांहून वेगळा आहे. पण हे माझे वैयक्तिक मत आहे. संघाची निवड आणि माझे मत यात अंतर आहे.’’