Asian Games 2018 : इंडोनेशियामध्ये १४ दिवसांपासून सुरु असलेला एशियाड स्पर्धांच्या खेळांचा थरार आज संपला. त्यात भारताने १४व्या दिवशी २ सुवर्ण पदके कमावत भारतीय चाहत्यांना शेवटच्या दिवशी गोड आठवणी दिल्या. बॉक्सर अमित पांघलने ४९ किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन-शिबनाथ सरकार या जोडीने ब्रिज क्रीडा प्रकारच्या पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकले. याशिवाय भारताने दिवसभरात स्क्वॉशमध्ये एका रौप्यपदकाची कमाई केली. तर भारतीय पुरुष हॉकी संघाने भारताला कांस्यपदक जिंकवून दिले आणि भारताची पदकसंख्या ६९वर नेली. महत्वाचे म्हणजे एशियाड स्पर्धांच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. या बाबत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. 'आपल्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. भारतीय इतिहासातील आशियाई क्रीडा स्पर्धांमधीळ हि सर्वोत्तम कामगिरी ठरली, याचा मला अभिमान आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना, विजेत्यांना आणि अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. पूर्वी आपले खेळाडू केवळ राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकत होते. पण आता हेच खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करत आहेत, याचा मला अभिमान आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले. Our athletes' performance in this #AsianGames2018 is the greatest in Indian history. I congratulate all athletes & officials. Earlier our athletes were giving their personal best on national level but now they are giving it in international games: R Rathore, Union Sports Minister pic.twitter.com/YJAj47Dr5y ; ANI (@ANI) September 1, 2018 भारताने यंदाच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक ६९ पदके मिळवली. या आधी गुआंगझू येथे झालेल्या २०१० सालच्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला ६५ पदके मिळवण्यात यश आले होते. तर १९८२ साली नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धांमध्ये भारताने ५७ पदकांची कमाई केली होती. तीच कामगिरी करण्यात भारताला २०१४च्या इंचियॉन आशियाई स्पर्धांमध्ये यश आले होते. याशिवाय, २००६ साली झालेल्या दोहा स्पर्धेत (५३), १९६२ सालच्या जकार्ता स्पर्धांमध्ये (५२) आणि १९५१ सालच्या नवी दिल्लीतील स्पर्धांमध्ये (५१) भारताला पदकांची अर्धशतक गाठता आले होते.