मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने आपल्या अखेरच्या टी-२० सामन्यात विंडीजच्या महिला संघावर मात केली आहे. ६१ धावांनी विजय मिळवत भारतीय महिलांनी ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादन केलं. भारताकडून पहिल्यांदा फलंदाजी करताना वेदा कृष्णमुर्तीने ५७ तर मुंबईर जेमायमा रॉड्रीग्जने ५० धावा केल्या.

पहिल्यांदा फलंदाजी करत असलेल्या भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना झटपट माघारी परतल्या. मात्र यानंतर जेमायमा रॉड्रीग्ज आणि वेदा कृष्णमुर्ती यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिलांनी १३४ धावांपर्यंत मजल मारली.

प्रत्युत्तरादाखल विंडीजचा डाव पूरता कोलमडला. एकही फलंदाज भारतीय गोलंदाजाचा सामना करु शकली नाही. क्योश्ना नाईट आणि शेमिन कँपबेल यांचा अपवाद वगळता एकही विंडीजची फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकली नाही. विंडीजचा पूर्ण संघ अवघ्या ७३ धावांत गारद झाला. भारताकडून गोलंदाजीत कोल्हापूरच्या मराठमोळ्या अनुजा पाटीलने २ तर राधा यादव, पूनम यादव, पुजा वस्त्राकर आणि हरलीन देओल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.