जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि आव्हानवीर मॅग्नस कार्लसन यांच्यातील जागतिक अजिंक्यपद सामन्यांची सर्वात महत्त्वाची फेरी गुरुवारी दुपारी खेळली जाणार आहे. या फेरीतील आनंदच्या खेळावर त्याच्या जगज्जेतेपदाचे भवितव्य अवलंबून आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला ‘शेरलॉक होम्स’कडे जायची गरज नाही. पहिल्या आणि तिसऱ्या फेरीत सुंदर खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या आनंदला इच्छाशक्ती कमी पडली होती, की त्याचे तंत्र कमी पडले ते एक तोच जाणो; पण भारतीय हॉकी संघाप्रमाणे चांगले खेळूनही  गोल करण्यात तो कमी पडला एवढे निश्चित!
गुरुवारी दुपारी सामना रंगणार एवढे नक्की! कारण एका विजयाने दोघांच्याही मनोवृत्तीमध्ये कमालीचा फरक पडू शकतो. आज जगाचे मत काहीही असो ,पण गॅरी कास्पारोव्हच्या मते खरीखुरी मनोबलाची कसोटी लागणार असेल तेथे आव्हानवीर उघडा पडतो. तरुण मॅग्नसला बरोबरी पुरत असताना लंडनमध्ये पात्रता फेरीच्या अखेरच्या डावात तो पीटर स्वीडलरकडून सहजी पराभूत झाला होता. त्या वेळी क्रामनिकची साडेसाती सुरू असावी, कारण अखेरची फेरी तोपण हरला आणि मॅग्नसला चेन्नईचे तिकीट मिळाले.
आता जगज्जेतेपद हातातोंडाशी आलेले असताना मॅग्नस किती निग्रह दाखवतो हे खरे आज दुपारी पाहायला मिळेल. आठव्या डावात तो ज्या पद्धतीने खेळत होता त्यावरून आता त्याला जरा ‘ग’ची बाधा तर नाही ना झाली असे जाणकारांना वाटून गेले, कारण मॅग्नस पुरा अर्धा तासपण न घेता संपूर्ण डाव खेळला. याला त्याचा आत्मविश्वास म्हणावा, की तरुणाईची घाई तेच कळत नाही .
मला माझ्या एका शिष्याची आई कौतुकाने म्हणाली की, इतका महत्त्वाचा डाव हरूनही आनंद कित्ती शांत होता नाही? नाही तर आमचा बाब्या- एक डाव हरला, की इतका आक्रस्ताळेपणा करतो! यावरून मला माजी जगज्जेत्या अ‍ॅलेक्झांडर अलेखीनची गोष्ट आठवते. एकदा अलेखीन एका सामान्य खेळाडूकडून घोडचूक करून एक डाव हरला. त्यानंतर अलेखीनने भर स्पध्रेच्या ठिकाणी आपल्या प्रतिस्पध्र्याचे खूप कौतुक केले. शांतपणे जगज्जेता हॉटेलमधल्या आपल्या खोलीत गेला आणि त्याने आपल्या खोलीतील सगळे फíनचर तोडून टाकले. एक खुर्ची, टेबल किंवा आरसा जगज्जेत्याच्या रागापासून बचावले नाहीत. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रे त्याच्या खिलाडूवृत्तीचे गोडवे गात असताना अलेखीन हॉटेलची नुकसानभरपाई करून देत होता.
तरी अलेखीन परवडला! त्याने तर फíनचर तोडले. एका दंतकथेप्रमाणे ग्रँडमास्टर निमझोवीच तर एकदा डाव हरल्यावर त्याच टेबलावर उभा राहून मोठमोठय़ाने ओरडत होता, ‘‘या मूर्खाशी मी हरलोच कसा?’’ एवढे बोलून निमझोवीच थांबला नाही, तर त्याने आपल्या प्रतिस्पध्र्याला उचलून खिडकीतून बाहेर टाकून दिले. सुदैवाने ते तळमजल्यावर खेळत होते!  
आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे नवव्या डावाकडे! दोघाही योद्धय़ांच्या दृष्टीने ही अंतिम घटिका आहे. कोणाचे मनोरथ साकार होते आणि कोणाचे धुळीला मिळते याचा सोक्षमोक्ष आज लागणार आहे.