लागोपाठ दोन सामने जिंकल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या विदर्भ संघाच्या आव्हानास बंगालचे खेळाडू कसे सामोरे जातात हीच येथे शनिवारपासून सुरू होत असलेल्या रणजी क्रिकेट सामन्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विदर्भ संघाने नुकत्याच झालेल्या लढतीत महाराष्ट्रावर ८२ धावांनी सनसनाटी विजय मिळविला आहे. त्याआधी त्यांनी आसामलाही सहज पराभूत केले होते. पाच सामन्यांअखेर त्यांनी १६ गुणांसह साखळी गटात दुसरे स्थान घेतले आहे.
या तुलनेत बंगाल संघास या मोसमात अपेक्षेइतके यश मिळविता आलेले नाही. त्यांनी चार सामन्यांमध्ये केवळ दहा गुणांची कमाई केली आहे. अभिमन्यू ईश्वरन हा दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यामुळे त्यांच्या सलामीची बाजू बळकट झाली आहे. संघाचे प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी संघाच्या कामगिरीबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले. विदर्भ संघाबाबत आम्ही फाजील आत्मविश्वास ठेवणार नाही. तरीही घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ आम्हाला मिळेल अशी आशा आहे.