सलामीचा फलंदाज विराग आवटे याने पदार्पणातच केलेल्या नाबाद शतकासह महाराष्ट्राने विदर्भविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात ३ बाद २२७ अशी शानदार सलामी केली. महाराष्ट्राने सलामीवीर हर्षद खडीवाले (तीन चौकारांसह २६ धावा) याची विकेट लवकर गमावली. मात्र आवटे याने संग्राम अतितकर याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ३६ षटकात ९४ धावांची भागीदारी केली तर कर्णधार रोहित मोटवानी याच्या साथीत त्याने चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची अखंडित भागीदारी रचली. त्यामुळेच महाराष्ट्राचा डाव सावरला गेला. आवटे याने केलेल्या नाबाद १११ धावा हेच महाराष्ट्राच्या पहिल्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. त्याने ३०२ चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकार मारले. अतितकर याने तीन चौकार व दोन षटकारांसह ४५ धावा केल्या. मोटवानी याने दोन चौकारांसह नाबाद २४ धावा केल्या. विदर्भ संघाकडून साईराज बहुतुले याने ५५ धावांमध्ये दोन गडी बाद केले. संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद २२७ (विराग आवटे खेळत आहे १११, हर्षद खडीवाले २६, संग्राम अतितकर ४५, रोहित मोटवानी खेळत आहे २४ साईराज बहुतुले; २/५५).