गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या विराट-अनुष्का लग्नाच्या चर्चेला अखेर सोमवारी पुर्णविराम मिळाला. इटलीमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित दोघांनी आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरु केली. विराट-अनुष्काची यांची चर्चा तशी नवी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या जोडीवर प्रसार माध्यमांचे कॅमेरे टपून बसले होते. दोघांच्या नात्याबाबत बित्तम बातम्या माध्यमे देत होती. मात्र, मैदानातील धमाकेदार कामगिरीनं प्रतिस्पर्ध्यांना हतबल करणाऱ्या विराटने प्रसारमाध्यमांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या इव्हेंटपासून दूर ठेवण्यात यश मिळवले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट विश्रांती घेणार याबाबत चर्चा जोर धरु लागली होती. कारण विराटने विश्रांतीचा आधार घेत सुट्टीची विनंती केली होती. यासोबत त्याने खेळाडूंच्या मानधनाच्या मुद्यावर भाष्य करत वेगळ्या मुद्द्याकडे माध्यमांचे लक्ष वेधले. यंदाच्या वर्षात विराट कोहली सर्वाधिक सामने खेळला आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे, हे सर्वमान्य होते.

पण, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात १०४, दुसऱ्या सामन्यात २१३ आणि तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात २४६ आणि ५० ही धावासंख्या त्याला थकवा वैगेरे नाही, हेच सांगते. मात्र, विराटला ही दीर्घ विश्रांती थकवा दूर करण्यासाठी नाही, तर लग्नासाठी हवी होती, हे स्पष्ट झाले आहे. एखाद्या विवाहाची आठवड्याभरात तयारी करणे सहज आणि सोपे नाही. त्यात विराट-अनुष्का यांसारख्या लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जोडीच्या विवाहाच्या तयारीला फक्त आठ दिवस हे म्हणजे अशक्यच!

विराटचा हा लग्नसोहळा श्रीलंकेच्या भारत दौऱ्यानंतर पार पडला असला तरी विराट भारत-श्रीलंका दौऱ्यावर गेला होता, तेव्हापासून लग्नाची तयारी सुरु होती का? असा प्रश्न दोघांच्या चाहत्यांना नक्कीच पडू शकतो. ही जोडी ज्यावेळी मायदेशी परतेल त्यावेळी कदाचित तयारीबद्दल ऐकायलाही मिळेल. मात्र, तोपर्यंत विराट-अनुष्का आपल्या लग्नाची तयारी गोपनिय ठेवण्यात यशस्वी ठरले, असेच म्हणावे लागेल. मैदानात प्रतिस्पर्ध्यांना हताश करणाऱ्या विराटने खेळातील सातत्य, विश्रांती, खेळाडूंच्या मानधनाचा मुद्दा यामध्ये माध्यमांना अडकवून त्याने लग्नाच्या तयारीची कल्पनाही कोणाला येऊ दिली नाही.