जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने टी -२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारणार नाही, असं जाहीर केलं आहे. विराटने ट्विट करून ही माहिती दिली. विशेषत: आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या आधीच त्यानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर विराटनं एक पत्रच ट्वीट केलं असून त्यामध्ये आपल्या निर्णयाविषयी त्यानं सविस्तर लिहिलं आहे. मात्र, एक फलंदाज म्हणून तो संघात असेल.

विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाचा पुढील कर्णधार कोण असले, अशी चर्चा रंगली आहे. मात्र विराटने पत्रात रोहित शर्माची चांगलीच स्तुती केली. त्यामुळे रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विराट पत्रात पुढे म्हणतो, “आपल्यावर असणारा ताण समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि गेल्या ८ ते ९ वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमसाठी तिन्ही प्रकारांमध्ये (टी २०, कसोटी, एकदिवसीय) आणि गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने कर्णधारपद सांभाळताना मला आता वाटू लागलं आहे की मी स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून मी शक्य ते सगळं काही संघाला दिलं आहे. एक फलंदाज म्हणून यापुढेही मी ते करत राहणार आहे.”

Virat Kohli Steps Down : टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली पायउतार होणार; ट्वीटरवर केलं जाहीर!

दरम्यान, “सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचं विराट सांगतो. “अर्थात, या निर्णयापर्यंत येण्यासाठी बराच काळ लागला. माझ्या जवळच्या व्यक्तींशी, रवीभाई, रोहित यांच्याशी खूप सारी चर्चा केली आहे. त्यानंतर मी या निर्णयाप्रत आलो आहे की ऑक्टोबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मी टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होणार आहे.”

रोहित बाबत विराट म्हणाला…

या पोस्टमध्ये कर्णधार कोहलीने कर्णधारपद सोडण्याबरोबरच कर्णधारपदाची जबाबदारी संघाचा उपकर्णधार रोहित शर्माकडे सोपवण्याचे सुचवले आहे. यासह, रोहित शर्माच्या नेतृत्व गुणवत्तेचेही त्याने कौतुक केले आहे. रोहित संघातल्या लीडरशिप वर्तुळातला महत्त्वाचा हिस्सा असल्याचं विराट म्हणाला.