विराट कोहलीच्या नेृत्वातील भारतीय संघाने कसोटी मालिकेत विडिंजचा दारूण पराभव केला आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारताने विडिंजच्या संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवलं. या विजयासह विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार झाला आहे. विराट कोहलीने माजी कर्णधार एम. एस धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा २८ वा विजय आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं २७ कसोटी सामने जिंकले होते.

माजी कर्णधार धोनीने ६० कसोटी सामन्यात भारताला २७ सामने जिंकून दिले होते. कोहलीने ४८ व्या सामन्यात २८ वा विजय साजरा करत नवा विक्रम नावे केला आहे. विराट कोहली आशिया खंडातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. याशिवाय ४८ सामन्यात सर्वात कमी पराभाव विराट कोहलीने पाहिले आहेत. कर्णधार म्हणून कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत फक्त दहा सामने गमावले आहेत. २०१४ मध्ये विराट कोहलीने भारतीय संघाची सुत्रे सांभाळली होती.

या विजयासह भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण १२० गुण झाले आहेत. गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे. विराटसेनेचा विंडीज दौरा यशस्वी संपला आहे. १५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकामध्ये टी-२० आणि कसोटी मालिका होणार आहे.

अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही विंडीजला झटपट गुंडाळत सामना आपल्या खिशात घातला. भारतीय संघाने कसोटीत २५७ धावांनी बाजी मारत मालिकेत २-० अशी सरशी साधली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद शामी आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.