भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली सध्या BCCI च्या अध्यक्षपदामुळे चर्चेत आहे. तशातच गांगुलीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचे तोंडभरून कौतुक केले आहे. विराट कोहली हा भारताची शान आणि गौरव आहे, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपले मत व्यक्त केले.

पुढील वर्षी भारतात टी २० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारताकडून खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आतापासूनच सर्वोत्तम संघ कसा असावा, याची चाचपणी सुरू आहे. भारताला विराटसारखा एक चांगला आणि निर्भिड कर्णधार लाभला आहे. तो भारताची शान, गौरव आणि अभिमान आहे. विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत कोणताही दबाव बाळगू नये. त्याने मनासारखे खेळावे. कारण सामना बैठकीत नाही, तर मैदानात जिंकला जातो, असे म्हणत गांगुलीने विराटचा स्तुती केली आणि त्याला BCCI चा पूर्णपणे पाठिंबा असेल असे संकेत दिले.

दरम्यान, BCCI च्या अध्यक्षपदाबाबतही गांगुलीने मत व्यक्त केले. BCCI च्या अध्यक्ष पदासाठी माझी निवड होणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. यासाठी ज्यांनी मला सहकार्य केले, त्यांचा मी आभारी आहे. सक्षम उमेदवारालाच हे पद मिळते. मी या पदावर असताना सगळ्यांना एकत्र घेऊन काम करेन. क्रिकेटच्या विचारांचा आदर करत आणि कुठल्याही दबावाला बळी न करता मी कार्यकाळ पूर्ण करेन, असे गांगुलीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.