संघात अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान पाच एकदिवसीय सामने होणार आहेत. भारतीय संघातून सध्या उत्तम कामगिरी करणारे खेळाडू स्वत कर्णधार महेंद्रसिंग धोनी, गोलंदाज आर.अश्विन, तिरंगी मालिकेत मालिकावीर ठरलेला गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याचबरोबर गतीमान गोलंदाज ईशांत शर्मा, उमेश यादव या सर्वांना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे संघाची गोलंदाजी अगदी नवखी आहे. त्यामुळे सर्व क्रिकेटरसिकांकडून या नव्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा आहेच आणि याची सर्वतोपरी कल्पना या नव्या संघाला आहेच. त्याच दृष्टीकोनातून युवा संघ जोमाने सराव करत आहे.
उद्या बुधवार २४ जुलै रोजी झिम्बाब्वे विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना होणार आहे.
याआधीसुद्धा २००२ साली सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये एकदिवसीय मालिका खेळला होता. त्यावेळी भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवाची पुरेपूर भरपाई करण्याचा मानस भारतीय संघाचा असेल. झिम्बाब्वे संघ भारतीय संघाच्या तुलनेत तितकासा सामर्थ्यवान नसला तरी, नवखा भारतीय संघ झिम्बाब्वेविरु्द्ध खेळणार आहे. त्यामुळे मालिका रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.